महाराष्ट्राचा इतिहास

From Wikipedia

 या लेखात किंवा विभागात नुकताच मोठा बदल किंवा पुनर्लेखन झाले आहे. कृपया या बाबत आपले मत/विचार चर्चा पानावर मांडा.
महाराष्ट्र राज्य:नकाशा
Enlarge
महाराष्ट्र राज्य:नकाशा

महाराष्ट्रातील विविध स्थळांचा-नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.

महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरी चे यादव, अल्ला उद्दिन खिलजी, मुहम्मद बीन तुघलक, पोर्तुगीज, विजापुर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.

अनुक्रमणिका

[संपादन] नावाचा उगम

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जावू लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महाररट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महा-कंतारा (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

[संपादन] मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य

अजिंठातल्या लेणी
Enlarge
अजिंठातल्या लेणी

महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३रया शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर (जे आजच्या मुंबईच्या उत्तरेस स्थित आहे), प्राचीन भारताच्या व्यापाराचे केंद्र होते. या बंदराहून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन या ठिकाणी व्यापार होत असे. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स ७८ रोजी महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू शालिवाहन शक आजही रूढ आहे.

वाकाटक (इस.२५०-५२५) च्या राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रन्यानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. इ.स. ७५३ रोजी राष्ट्रकूट साम्राज्य महाराष्ट्रावर राज्य करीत होते. इ.स ९७३ रोजी चालुक्यांनी पुन्हा सत्ता हस्तगत केली आणि महाराष्ट्राच्या काही भागांवर इ.स.११८९ पर्यंत राज्य केले. त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापीत केले.

१३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलकी व नंतर मोहम्म्द बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स.१३४७ तुघलकांच्या पडावानंतर बिजापूरच्या बाहमनी सुल्तानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले. १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मुघल साम्राज्यांशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी मध्य महाराष्ट्र व्यापलेला होता तर किनारपट्टीवर मसाला-व्यापाराच्या हेतुने आलेल्या पोर्तुगीज यांचा अंमल होता.

[संपादन] मराठा साम्राज्याचा उदय

छत्रपती शिवाजी महाराज
Enlarge
छत्रपती शिवाजी महाराज

१६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजे भोसल्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणगड जिंकला आणि १७व्या शतकाच्या मध्यास पश्चिम महाराष्ट्रात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवाजीराजांमुळे प्रथमच विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्याविरोधात स्वतंत्र मराठा राज्य उदयास आले. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांना १६७४ मध्ये राज्याभिषेक झाला.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना औरंगजेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. मोगलांनी संभाजीराजांचे धाकटे बंधू राजाराम यांना दक्षिणेस पिटाळले. राजाराम भोसल्यांनी जिंजी किल्ल्याची दुरुस्ती १८व्या शतकाच्या सुरुवातीस केली, जेव्हा तेथील परीस्थिती सुधारली होती.

राजारामांचे भाचे शाहू भोसले यांनी १७०८ साली मराठी दौलतीच्या गादीवर बसले. या कामास त्यांचे पेशवे (मुख्य मंत्री) बाळाजी विश्वनाथ यांची साथ मिळाली. राजारामांची विधवा पत्नी ताराबाई यांच्याशी शाहू भोसले यांचे मतभेद होते.

चार दशकांनंतर 'छत्रपतींच्या' (भोसले राजघराण्यातील) नावाने राज्यकारभार पाहणार्‍या पेशव्यांच्या हाती मराठा साम्राज्याची सूत्रे आली. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले.

[संपादन] पेशव्यांचा काळ

बालाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव (पहिले) यांनी मराठा राज्य वाढवले. त्यांनी मोगल राज्यांकडून कर व सारा (सरदेशमुख व चौथ यांच्यामार्फत) वसूल करण्याची प्रथा पाडली. पेशव्यांच्या अंमलाखाली प्रगत व्यापार, अर्थकारण यांचे जाळे अस्तित्वात आले. मुख्य कार्यालय पुण्यात व शाखा गुजरात, गंगेचे खोरे आणि दक्षिणेपर्यंत वाढल्या. शेतीचे देखिल विस्तारीकरण झाले. त्याचबरोबर पेशव्यांनी दर्यावर्दी कान्होजी आंग्रे यांना हाताशी धरुन कुलाबा व पश्चिम तटावरील इतर बंदरे उदयास आणली. या जहाजांनी मुंबईतील ब्रिटीश, गोव्यातील पोर्तुगीज, बसीन व दमण यांना काबूत ठेवले.त्याचबरोबर मराठा साम्राज्याच्या बाहेर आपल्या सेनापतींना दिलेल्या जहागिरींमार्फत आपले स्वामीत्व स्थापन केले.पेशव्यांनी ग्वाल्हेर शिंदेंना, इंदूर होळकरांना, बडोदा गायकवाडांना तर धार पवारांना दिले.

पेशव्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली (पानीपत), गुजरात (मेहसाणा), मध्य प्रदेश (ग्वाल्हेर, इंदूर), व दक्षिणेस तंजावर पर्यंत राज्य वाढवले.

इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसरया लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालींनी पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व अनेक स्थानिक राज्यात विभागणी झाली. पेशव्यांच्या पूर्व-सेनापतीं आपआपले राज्य संभाळू लागले तर पुणे पेशवे परिवारांकडे राहिले. भोसल्यांची एक शाखा कोल्हापूरात गेली तर मुख्य समूहाचे वास्तव्य सातारा येथेच राहिले. कोल्हापूरचे भोसले म्हणजेच राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचे वंशज ज्यांनी इ.स.१७०८ रोजी शाहूंचे राज्य अमान्य केले. १९व्या शतकापर्यंत कोल्हापूरच्या भोसल्यांनी छोट्या भूभागावर राज्य केले.

[संपादन] ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ

लोकमान्य टिळक
Enlarge
लोकमान्य टिळक

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स.१७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. इ.स.१८१९ रोजी ब्रिटिशांनी मराठ्यांचे राज्य काबीज केले. महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपाआपले राज्य संभाळीत होते. आजचे नागपूर, साताराकोल्हापूर हे त्या काळात विविध राज्यकर्त्यांच्या ताब्यात होते. सातारा इ.स.१८४८ रोजी बॉम्बे राज्यात तर नागपूर इ.स.१८५३ रोजी नागपूर प्रांतात (व नंतर मध्य प्रांतात) सामिल करण्यात आला. बेरार हे हैदराबादच्या निझामाचा एक भाग होते. ब्रिटिशांनी इ.स १८५३ रोजी बेरार काबीज केले व १९०३ रोजी मध्य प्रांतात समाविष्ट केले. मराठवाडा निझामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांना सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक या नेत्यानी ब्रिटिशांविरुध्द लढा उगारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्वाचे केंद होते.

[संपादन] महाराष्ट्र राज्याची निर्मिती

हुतात्मा स्मारक,मुंबई
Enlarge
हुतात्मा स्मारक,मुंबई

पहा संयुक्त महाराष्ट्र चळवळ

भारताला इ.स.१९४७ रोजी स्वातंत्र्य लाभले.भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरुन मराठी-जनात क्षोभ उसळला. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याचा मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९ व्या शतकापासून विविध मराठी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व समाजाने मोठ्या प्रमाणावर सामाजिक उत्क्रांती आणि राजकीय स्वातंत्र्याकरीता मोलाचे योगदान केले.१९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागास एकत्र आणले. स्वातंत्र्य उत्तर राजकीय दृष्ट्या यशस्वी सहकारी चळवळी आणि जातीय गणितांतील प्रभुत्वाने कॉंग्रेस पक्षाचे शासनात वर्चस्व राहीले. राजकीय समीकरणात मराठा समाज व पश्चिम महाराष्ट्र सदैव अग्रणी राहीला. श्री. य. दि. फडके या इतिहासकारांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा काळाचा उद्बोधक आढावा घेतला आहे.

[संपादन] हे देखिल पहा

[संपादन] संदर्भ

इंग्रजी विकिपीडिया-Maharashtra