चंगीझ खान

From Wikipedia

 या लेखात किंवा विभागात नुकताच मोठा बदल किंवा पुनर्लेखन झाले आहे. कृपया या बाबत आपले मत/विचार चर्चा पानावर मांडा.
चंगीझ खान
खान (मंगोल शासक)
चंगीझ खानाचे व्यक्तिचित्र
राज्यकाळ १२०६ऑगस्ट १८, १२२७
पूर्ण नाव तेमुजीन बोर्जिगीन
जन्म ११६२
हेन्ती प्रांत, मंगोलिया
मृत्यू ऑगस्ट १८, १२२७
उत्तराधिकारी ओगदेई खान
वडील येसुगेई
आई हौलन
पत्नी बोर्ते,

कुलन,
यिसुगेन,
यिसुई,
आणि इतर

संतती जोची,

चुगतई,
ओगदेई,
तोलुई,
आणि इतर

राजघराणे बोर्जिगीन


चंगीझ खान किंवा चंगेझ खान किंवा (फारसी दस्त‍ऐवजांप्रमाणे) गेंगीझ खान (इ.स. ११६२ - इ.स. ११६२) हा १२ व्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्याने मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जिगीन होते.

पाश्चात्य इतिहासकारांनी चंगीझ खानाचे वर्णन रक्तपिपासू, क्रूरकर्मा जगज्जेता असे केले असले तरी मंगोलियात त्याला राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. जगातल्या सर्वात शक्तिशाली व यशस्वी शासकांमध्ये चंगीझ खानाची गणना होते.

अनुक्रमणिका

[संपादन] बालपण

[संपादन] चंगीझकालीन मंगोलिया

१२ व्या शतकात मंगोलियाच्या पठारावर अनेक रानटी टोळ्यांचे वास्तव्य होते. या भटक्या टोळ्यांचा मुख्य उद्योगधंदा पशुपालनाचा होता. उन्हाळ्यात ते भाजीपाल्याची लागवड करत व हिवाळ्यात बोचरी थंडी टाळण्यासाठी दक्षिणेकडे आपला तळ हलवत. पक्की घरे न बांधता "गेर" नावाच्या तंबूत त्यांचे वास्तव्य असे. मंगोलियाचे वाळवंट व पठारावरील गवताळ प्रदेश त्यांना उपजीविकेच्या संधी देण्यास असमर्थ होते. यामुळे आपापसातील चकमकी, लुटालुट यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे.


[संपादन] जन्म

चंगीझ खानाचा जन्म इ.स. ११६२ साली मंगोलियातील ओनोन नदीजवळील प्रदेशात येसुगेई नावाच्या एका मंगोल टोळीप्रमुखाच्या घरी झाला. येसुगेई हा कियाड टोळीचा प्रमुख होता. ही टोळी इतर टोळ्यांच्या मानाने हलक्या दर्जाची समजली जाई. त्याच्या आईचे नाव हौलन असे होते. चंगीझ खानाच्या जन्मापूर्वी येसुगेईने 'तेमुजीन उगे' या तातार योद्ध्याला लढाईत ठार केले होते. घरी परतल्यावर त्याला पुत्रजन्माची बातमी कळताच त्याने आपल्या शौर्याचे प्रतीक म्हणून जन्मलेल्या बाळाचे नाव तेमुजीन असे ठेवले.

तेमुजीन जन्मला तेव्हा त्याच्या मुठीत रक्ताची गुठळी होती असे सांगितले जाते. त्यावरून तो मोठेपणी अतिशय पराक्रमी परंतु क्रूर योद्धा बनेल असे भविष्य वर्तवण्यात आले होते. तेमुजीनच्या जन्माबद्दलची ही गोष्ट सर्वत्र आढळल्याने ती केवळ आख्यायिका नसावी असे तज्ज्ञांचे मत आहे.

[संपादन] कुटुंब

मंगोल टोळ्यांचे 'घर' - फिरते तंबू "गेर"
Enlarge
मंगोल टोळ्यांचे 'घर' - फिरते तंबू "गेर"

लहानपणापासूनच तेमुजीनला धनुष्य बाण चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले. त्याचप्रमाणे अगदी लहान वयातच त्याला घोडेस्वारी शिकवण्यात आली. भरधाव दौडणार्‍या घोड्यावरून अचूक नेम साधण्यात मंगोल योद्धे पटाईत होते, . पुढे याच कौशल्याचा मंगोल सैन्याला अनेक महत्त्वाच्या लढायांत फायदा झाला.

तेमुजीन सुमारे ९ वर्षांचा असताना त्याचे वडील त्याचे लग्न लावून देण्यासाठी त्याला आपल्या समवेत घेऊन दुसर्‍या टोळीच्या भेटीस गेले. तेथे तेमुजीनचे लग्न त्या टोळीप्रमुखाची मुलगी बोर्ते हिच्याशी ठरवण्यात आले. मंगोल टोळ्यांच्या रीतीरिवाजांप्रमाणे तेमुजीनला लग्नापूर्वी आपल्या नववधूच्या घरी काही वर्षे राहून तिच्या कुटुंबियांची सेवा करणे भाग होते. त्यानुसार त्याला बोर्तेच्या घरी ठेवून येसुगेई एकटाच परतला.

परंतु वाटेत एका सहभोजनाच्या दरम्यान येसुगेईला तातार टोळीने विषप्रयोग करून मारले. तेमुजीनपर्यंत ही बातमी पोहोचल्यावर तो बोर्तेला मागे ठेवून आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा करूनच आपल्या टोळीत परतला. येसुगेईच्या मागे दोन बायका व सात मुले अशा सर्वांची जबाबदारी लहानग्या तेमुजीनवर येऊन पडली. तेमुजीनच्या कमी वयामुळे त्याच्या टोळीतील इतरांनी त्याला टोळीप्रमुख बनवण्यास आक्षेप घेतला आणि त्याला, तसेच त्याच्या कुटुंबाला हाकलून दिले. त्यामुळे तेमुजीनच्या मनात स्वत:च्या टोळीबद्दल घृणा निर्माण झाली.

[संपादन] खडतर काळ व युद्धमय जीवन

मंगोलियाच्या उजाड पठारावरील या कठीण कालखंडात तेमुजीनने आपल्या कुटुंबाची सर्वतोपरीने काळजी घेण्याचा प्रयत्न केला. याच काळात त्याची मैत्री दुसर्‍या एका टोळीतील त्याच्याच वयाच्या जमुगाशी झाली. दोघांनी बंधुत्वाच्या शपथा घेतल्या. यानंतर एकदा तेमुजीन मासे पकडत असता त्याच्या हाती आलेला मासा त्याच्या बेख्तेर या सावत्र भावाने चोरला व एकटयानेच फस्त केला. अशा कठीण काळात मिळालेले अन्न वाटून न खाण्याची वृत्ती पाहून तेमुजीनने बेख्तेरला अन्न चोरी केल्याची शिक्षा म्हणून ठार केले. बेख्तेर हा तेमुजीनपेक्षा वयाने अंमळ मोठा असल्याने त्याने आपल्याच घरातल्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला ठार करून स्वत:च्या मार्गातील काटा दूर केला असेही म्हटले जाते.

या गोष्टीचा गवगवा होऊन पुढे एकदा शिकारीवर असताना तेमुजीनला त्याच्याच टोळीकडून जेरबंद केले गेले. तिथे तेमुजीनने रक्षकांना ठार करून मोठ्या कौशल्याने आपली सुटका केली व परत येऊन तो आपल्या कुटुंबाला मिळाला. तेमुजीनच्या शौर्याची कीर्ती सर्वदूर पसरली. पुढे त्याच्या कुटुंबावर पुन्हा हल्ला होऊन त्यांना लुटले गेले, त्यात त्याचे घोडे लुटारूंनी पळवले. तेमुजीनने लुटारूंचा पाठलाग केला, पण तो व्यर्थ ठरला. याच सुमारास त्याची गाठभेट बोगुर्ची या धनाढ्य इसमाशी झाली. या दोघांत घनिष्ठ मैत्री निर्माण झाली आणि बोगुर्चीने तेमुजीनला त्याचे चोरलेले घोडे परत मिळवून देण्यास फार मदत केली.

त्यानंतर सुमारे चार वर्षांनी तेमुजीनचे लग्न बोर्तेशी झाले, पण दुर्दैवाने थोड्याच काळात बोर्तेचे दुसर्‍या एका टोळीकडून अपहरण करण्यात आले. तेमुजीन व त्याचे कुटुंबीय या टोळीचा सामना करण्यास असमर्थ होते. तेमुजीनने बोर्तेला परत मिळवण्यासाठी वांग खान नावाच्या आपल्या वडिलांच्या मित्राची मदत घेण्याचे ठरवले व दोघांनी मिळून तातार व इतर मंगोल टोळ्यांवर हल्ले करण्यास साथ देण्याची शपथ घेतली (वांग खानाचे नाव काही ठिकाणी तोग्रुल असल्याचे वाचनात आले आहे. [ संदर्भ हवा ]). त्यानुसार वांग खान आपल्या योद्ध्यांसमवेत तेमुजीनला येऊन मिळाला. यावेळेस तेमुजीनचे वय १७ वर्षे होते. वांग खानाने बोर्तेच्या सुटकेसाठी तेमुजीनला दुसर्‍या एका मित्रटोळीतील योद्ध्याची मदत घेण्यास सांगितले. हा योद्धा दुसरातिसरा कुणी नसून चंगीझचा बालमित्र जमुगा होता. दोघांनी आपल्या मैत्रीच्या आणाभाका स्मरून बोर्तेचा शोध घेतला व तिची सुटका केली.

त्यानंतर जमुगा व तेमुजीन यांनी एकत्र आपली टोळी प्रस्थापित केली. या टोळीची कीर्ती लवकरच मंगोल पठारावर सर्वदूर पोहोचली. पण थोड्याच काळत जमुगाला, तेमुजीन वरचढ होतो आहे अशी भीती वाटू लागली व त्याने तेमुजीनला टोळीतून बाहेर पडून वेगळी टोळी स्थापन करण्याचे सुचवले. यामुळे दुखावलेला गेलेला तेमुजीन आपल्या कुटुंबासमवेत जमुगाच्या टोळीतून रातोरात बाहेर पडला.

या नंतरच्या काळात बरेच योद्धे व लहान मोठ्या टोळ्या आपली शस्त्रे, माणसे, घोडे घेऊन तेमुजीनला येऊन मिळाल्या. तेमुजीनने आपल्या हजारोंच्या सैन्याला कडक शिस्त लावली होती. जमुगाच्या टोळीशी मात्र त्याने वैर पत्करले व पुढील अनेक वर्षे मंगोल टोळ्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जमुगा व तेमुजीनच्या टोळीत अनेक चकमकी झाल्या.

[संपादन] तेमुजीन ते चंगीझ खान नावाचा प्रवास

इ.स. ११८३ साली तेमुजीनच्या मंगोल सैन्याने त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास दर्शवून त्याला 'चंगीझ' असे संबोधण्यास सुरुवात केली. चंगीझ या शब्दाचा अर्थ 'सर्वोत्तम योद्धा' असा समजला जातो. जरी चंगीझला 'सर्वोत्तम योद्धा' असे संबोधले गेले, तरी या काळात बर्‍याच मंगोल टोळ्या चंगीझच्या आधिपत्याखाली आलेल्या नव्हत्या. यापुढील काळात अनेक स्वार्‍या करून त्याने आपले स्वामित्व सिद्ध केले.

तरीदेखील तो आणि जमुगा हे दोघे वांग खानाचे मांडलिक म्हणूनच ओळखले जात होते. जमुगा हा चंगीझचा बालपणीचा मित्र आणि एका सबळ टोळीचा प्रमुख होता. जातीने त्याची व वांग खानाची जमात चंगीझच्या जमातीपेक्षा श्रेष्ठ गणली जाई. याकारणास्तव पुढे या दोघांना चंगीझ डोईजड होऊ लागला. इ.स. १२०० च्या सुमारास वांग खान व जमुगाच्या टोळ्यांच्या चंगीझच्या टोळीशी चकमकी झडू लागल्या. इ.स. १२०१ मध्ये जमुगाच्या आणि वांग खानाच्या टोळ्यांना चंगीझने जवळजवळ संपुष्टात आणले. जमुगाशी शेवटची लढाई इ.स. १२०३ मध्ये लढली गेली व यात चंगीझने जमुगाला बंदिवान केले. त्याला चंगीझने आपल्या आधिपत्याखाली येण्याचे आमंत्रण दिले. जमुगाने तसे करण्यास नकार दिला व चंगीझकडे देहदंडाची शिक्षा मागितली. मंगोल रीतीरिवाजांप्रमाणे जमुगाने 'रक्ताचा एकही थेंब न सांडता मरण द्यावे' अशी इच्छा प्रकट केली. त्यावर चंगीझने आपल्या जुन्या प्रिय मित्राला दोन गोधड्यांखाली दाबून गुदमरवून मृत्यू दिला. अशा प्रकारे सर्व मंगोल टोळ्यांवर चंगीझने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

यानंतर इ.स. १२०६ पासून चंगीझने आपल्या नावामागे 'खान' लावायला सुरुवात केली. खान या मंगोल शब्दाचा अर्थ 'शासक' असा होतो. मंगोलियातील सर्व टोळ्या आपल्या आधिपत्याखाली आल्यावर चंगीझने चीनवर स्वारी करण्याचा बेत आखला. त्यापूर्वी आपल्या मोठ्या मुलाला जोचीला त्याने सैबेरियावर स्वारी करण्यास पाठवले व तो भूभागही आपल्या अंकित केला.

[संपादन] चीनवर स्वारी

मंगोलियाच्या मानाने चीन हा त्याकाळी एक प्रगत भूभाग होता व धातूची भांडी, रेशीम, इतर वस्त्रे व कलाकुसरीच्या अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध होता. त्या काळात चीन, जुर्चेन, सुंगखितान अशा तीन मोठ्या साम्राज्यांत व काही लहान राज्यांत विभागला गेला होता. इ.स. १२०७ मध्ये चंगीझने चीनमध्ये प्रवेश करून भूभाग जिंकण्यास सुरुवात केली. उघर या राज्याने स्वत:हून व टंगट या राज्याने थोड्या लढ्यानंतर चंगीझचे मांडलिकत्व स्वीकारले.


[संपादन] जुर्चेन राज्यावर स्वारी

 मंगोलकालिन साम्राज्ये
Enlarge
मंगोलकालिन साम्राज्ये

झोंगडू (बीजिंग) प्रांतावर जुर्चेन या प्रबळ राज्यघराण्याची सत्ता होती. इ.स.१२१० मध्ये त्यांनी चंगीझकडे दूत पाठवून त्याला आपले मांडलिक होण्याची आज्ञा केली. याप्रकारावर संतापून चंगीझने या साम्राज्यावर हल्ला करण्याचे ठरवले. १२१५ पर्यंत बीजिंग जिंकून त्याने उत्तर चीन गिळंकृत केला. मंगोल सैन्याच्या मानाने चीनी सैन्य युद्धात तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रविण होते. त्यांची संख्याही मंगोल सैन्याच्या दुप्पट होती परंतु मंगोल सैन्याच्या युद्धनितीसमोर ते टिकाव धरू शकले नाही. याचे कारण असे की खडतर जीवनाला सरावलेल्या मंगोल सैन्याला उपाशीपोटी दिवसेंदिवस युद्ध करण्याचा सराव होता. युद्धक्षेत्राजवळील भूभाग बेचिराख करून त्यांनी चीनी सैन्याला नामोहरम केले. खितान राज्याचीही त्यांना या युद्धात मदतच झाली. चीनी सैन्याकडे असलेल्या तोफा व इतर युद्धसामुग्रीचे चंगीझला आकर्षण असल्याने त्याने अनेक अभियंते व कारागीरांना आपल्या बाजूला वळवले. जुर्चेन व खितान या दोन्ही राज्यांनी सरतेशेवटी चंगीझ खानाला आपला सम्राट म्हणून मान्यता दिली. चीन प्रांत लुटून त्याने अनेक कलाकार, स्थापत्त्यशास्त्रज्ञ, अभियंते, कारागीर यांना आपल्या समावेत मंगोलियाला नेले. पश्चिमेकडील इतर लहान राज्यांनी चंगीझचे प्रताप पाहून त्याचे मांडलिकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

चीनची दोन मोठी साम्राज्ये चंगीझला अशाप्रकारे मांडलिक झाली तरी संपूर्ण चीन जिंकायचे चंगीझचे स्वप्न मात्र त्याच्या आयुष्यात पूर्ण होऊ शकले नाही. ते पुढे त्याचा नातू कुब्लाई खान याने पूर्ण केले.

आपल्या राज्याला अधिक सुबत्ता यावी यासाठी त्याला व्यापार वाढवण्याचा उपाय सुचला. मध्य आशियाचा भाग व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा होता. तिथे मुसलमान राज्यकर्ते होते व त्यांनी कला, शिक्षण, संशोधन, कारागिरी व व्यापाराच्या क्षेत्रात वाखाणण्याजोगी प्रगती केली होती. धातूंपासून भांडी घडवणे, धारदार शस्त्रनिर्मितीसारख्या उद्योगांत ते मुरलेले होते. अशा राज्यांत व्यापार केल्याने आपल्याला, आपल्या राज्याला व सैन्याला फायदा आहे हे पाहून चंगीझने आपल्याकडील व्यापार्‍यांचा एक चमू तुर्कस्तानचा शाह, मुहम्मद दुसरा, ख्वारिज़मकडे पाठवली. या चमूचे नेतृत्व एका हिंदू व्यापार्‍याकडे होते. दुर्दैवाने वाटाघाटी फिस्कटल्या व ख्वारिज़मने त्यासर्वांची कत्तल केली.

झाल्या प्रकाराने संतप्त होऊन चंगीझने सूड उगवायचा ठरवले व आपला मोर्चा पश्चिमेकडे वळवला.

[संपादन] मध्य आशियावर स्वारी

१२१८ मध्ये चंगीझने मध्य आशियावर अनेक स्वार्‍या केल्या. तेथे झालेल्या तुंबळ युद्धात चंगीझ खानासोबत सुमारे एक लाखाहून अधिक सैन्य लढले. तर शाह, मुहम्मद दुसरा या मध्य आशियातील ख्वारिझम घराण्याच्या सत्ताधार्‍याकडून सुमारे चार लाखाहून अधिक सैन्य लढले. तरीही अंतिम विजय चंगीझ खानाच्या सैन्याचाच झाला. सुमारे ४ वर्षे हे युद्ध चालले. याकाळात आपल्या वाटेत येणार्‍या प्रत्येक लहान मोठ्या शहरावर चंगीझच्या सैन्याने हल्ला करून ते बेचिराख केले, लुटालुट केली.

[संपादन] निशापूरची लढाई

शत्रूला जीवंत सोडले तर तो उलटून पुन्हा हल्ला करण्याची शक्यता असल्याने चंगीझ या शहरातील नागरिकांना शरण येण्याचे आवाहन करत असे. जे शरण येत त्यांना जीवदान मिळत असे, परंतु जे विरोध करत त्यांना, बायकामुले इतकेच नाही तर पाळीव प्राण्यांसकट मृत्यू दिला जाई.

इराणमधील निशापूरच्या लढाईपूर्वी चंगीझने तेथील नागरिकांना शरण येण्याचा प्रस्ताव दिला होता. तो ज्यांनी मानला नाही त्यांची कत्तल करून चंगीझने या भागावर देखरेखीसाठी थोडे सैन्य ठेवले व पुढे कूच केले. चंगीझचे सैन्य परतून येणार नाही या विचाराने निशापूरच्या नागरिकांनी चंगीझच्या सैन्यावर हल्ला चढवला. यांत चंगीझच्या जावयाचा मृत्यू झाला. याप्रकाराने संतप्त झालेल्या चंगीझने आपल्या गरोदर मुलीला निशापूरवर हल्ला करून हवा तसा बदला घेण्याची मुभा दिली. असे सांगितले जाते की दु:खाच्या भरात चंगीझच्या मुलीने निशापूरमधील सर्व माणसे, प्राणी-पक्षी यांच्या हत्या करण्याचा आदेश दिला व सैन्याने तो पाळला.

ख्वारिझमच्या पराभवानंतर चंगीझचे सैन्य इराण, अफगाणिस्तानमधून मुल्तानपर्यंत पोहोचले. उत्तर भारतावर स्वारी करण्याचा चंगीझचा मानस मात्र पूर्ण होऊ शकला नाही. खडतर प्रवास व हवामानाला कंटाळलेल्या सैन्याला त्याने परतण्याचा आदेश दिला. मध्य आशियावरील स्वारीच्या दरम्यान सुमारे १,५००,००० माणसांची चंगीझने कत्तल केली असे सांगितले जाते. यासर्व भूभागातून त्याने केलेली लूट सुमारे ५ वर्षे अव्याहत मंगोलियाला पाठवली जात होती.


[संपादन] पूर्व युरोपावर स्वारी

ख्वारिझम राज्यवटीच्या पराभवानंतर चंगीझने आपल्या सैन्याची विभागणी केली. अर्ध्याहून अधिक सैन्यासमवेत चंगीझने इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारताच्या दिशेने कूच केले तर सुबदेई व जेबे या आपल्या विश्वासू सेनापतींच्या हवाले काही सैन्य करून त्यांना चंगीझने आपले सुमारे २०,००० सैन्य रशियाला रवाना केले. १२२३ मध्ये चंगीझच्या सैन्याने रशियाच्या ८०,००० वर सैन्याचा पाडाव केला व त्यांना पळता भुई थोडी केली. तिथून त्यांनी प्रचंड लुटालूट, जाळपोळ करत युरोपात प्रवेश केला. मार्गात येणार्‍या सर्व शहरांना लुटून बेचिराख करत चंगीझच्या सैन्याने रशिया, पोलंडहंगेरीची सर्व महत्त्वाची शहरे लुटली.

आपल्या कारकीर्दीत त्याने आजच्या काळातील मंगोलिया, चीन, अझरबैजान, रशिया, आर्मेनिया, जॉर्जिया, तुर्कस्तान, इराक, इराण, कझाकस्तान, कुर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कुवेत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मोल्दोव्हा या सर्व देशांच्या भूभागांवर निर्विवाद स्वामित्व मिळवले.

[संपादन] कुशल शासनकर्ता

चंगीझचे राज्य
Enlarge
चंगीझचे राज्य

एका बाजूने लुटालूट, जाळपोळ आणि शत्रूपक्षाच्या सार्वत्रिक हत्यांमुळे क्रूरकर्मा म्हणून ओळखला जाणारा चंगीझ दुसर्‍या बाजूने अतिशय कुशल, उदार व निष्ठावान शासनकर्ता म्हणूनही ओळखला जात असे. आपल्या सैन्यातील माणसांकडून तो संपूर्ण निष्ठेची अपेक्षा ठेवायचा. त्याच्या राज्यात राज्यद्रोह्यांना देहदंड दिला जाई. इतकेच नव्हे तर शत्रूपक्षाच्या फुटिर व राज्यद्रोही माणसांनाही त्याने देहदंडाची शिक्षाच दिल्याचे दिसून येते. तो अत्यंत कुशल सेनापती होता, चंगीझने आपल्या सैन्यात शिस्त बाणवली. त्याच्या सैन्यातील अधिकारी पद हे त्या त्या योद्ध्याच्या शौर्यावर व क्षमतेवर अवलंबून असे. सेनाधिकार्‍यांच्या मनात त्याच्याविषयी अपार श्रद्धा होती. मंगोल टोळ्यांचे फुटणे, एकमेकांपासून दुरावणे हे नित्याचे असले तरीही चंगीझच्या इतक्या वर्षांच्या राजवटीत त्याचा एकही सेनाधिकारी त्याला सोडून गेला नाही यावरून त्याचे माणसे जोडून ठेवण्याचे कौशल्य दिसून येते. युद्धात एखादा सैनिक मेला तर केलेल्या लुटीतला वाटा त्याची विधवा व पोरक्या मुलांकडे पोचता केला जाई. चंगीझच्या या कायद्यामुळे त्याचे दोन फायदे झाले; त्याचे सैनिक मृत्युपश्चात आपल्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल या विश्वासाने त्याच्यासाठी मरायला तयार होत व मेलेल्या सैनिकांचे कुटुंब चंगीझशी प्रामाणिक राहत असे.

चंगीझचे सैन्य केवळ मंगोल वंशाचे नव्हते; तर त्याने ज्या ज्या भूभागावर स्वारी केली तेथील राज्यांतील व टोळ्यांतील लोकांचाही आपल्या सैन्यात समावेश केला. आपल्या सैन्यात एकजूट रहावी म्हणून त्याने एक नवा कायदा अस्तित्वात आणला. त्यानुसार त्याने १० सैनिकांचा एक गट, अशा १०० गटांचा दुसरा गट अशी सैन्याची विभागणी केली. या गटांतील प्रत्येकाने बंधुत्वाची शपथ घेऊन एकमेकांशी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागणूक ठेवावी असा कायदा केला.

कुशल नेतृत्वाव्यतिरिक्त चंगीझच्या यशाची दोन प्रमुख कारणे आढळतात. सबळ हेरखाते हे त्यातील पहिले कारण होते. तर दुसरे कारण होते - एखाद्या भूभागावर स्वारी केल्यानंतर जर त्याला त्या शहरातून किंवा राज्याकडून विरोध झाला, तर तो ते शहर संपूर्ण बेचिराख करून टाकत असे; पण त्याचबरोबर युद्धसंधी करणार्‍या, त्याच्या विरुद्ध शस्त्रे न उचलणार्‍या शरणागतांना तो अभयदान देत असे. या दुसर्‍या कारणामुळे त्याच्याविषयी दहशत व आदर एकत्र दिसून येई.

त्याकाळातील बर्‍याच मंगोल टोळ्या या रानटी व अशिक्षित होत्या. आपल्या साम्राज्याची घडी नीट बसावी म्हणून त्याने कडक कायदे अस्तित्वात आणले. बायकांना पळवणे हा अक्षम्य गुन्हा मानला जाई. बायकांच्या खरेदी विक्रीला चंगीझने बंदी आणली. जन्मास आलेल्या सर्व संतती औरस असतील असा त्याने कायदा केला. इतरांची जनावरे पळवणे, हरवलेले जनावर किंवा हरवलेली संपत्ती हडप करणे हे ही गंभीर गुन्हे मानले जात.


[संपादन] सहिष्णू राज्यकर्ता

चंगीझच्या उदयापूर्वीपासूनच मंगोलियात ख्रिश्चन व बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. स्वत: चंगीझ पूर्वापार चालत आलेला मंगोल टोळ्यांचा धर्मच पाळत होता. इतर धर्मांबाबत त्याचा दृष्टीकोण सहिष्णू होता. आपल्या राज्यात त्याने सर्व धर्मांना अभय दिले. आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन दिले. त्याच्या घरातही त्याने असे विवाह घडवून आणले. असे केल्याने राज्यात एकोपा नांदतो व राज्यात एकी राहावी यासाठी धर्मांतराची अजीबात गरज नाही असा त्याचा विश्वास होता.

[संपादन] राज्याची वाटणी

वयोमानाने चंगीझला आपल्या प्रचंड राज्याची वाटणी करावी असे वाटू लागले. त्याला अनुक्रमे, जोची, चुगतई खान, ओगदेईतोलुई असे चार पुत्र होते. शांत आणि समजूतदार स्वभावाचा ओगदेई त्याला लहानपणापासून प्रिय होता. जन्माधिष्ठित पदांवर चंगीझचा विश्वास नव्हता, त्याचबरोबर सतत एकमेकांशी भांडणार्‍या जोची व चुगतई या दोन्ही मुलांवरही त्याचा विश्वास नसल्याने त्याने आपल्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून तिसरा मुलगा ओगदेईची निवड केली व इतर मुलांना राज्याच्या वाटण्या करून दिल्या.

[संपादन] मृत्यू

Enlarge

१२२७ मध्ये शिकार करत असता घोड्यावरून पडून चंगीझ खान जबर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उलानबातरजवळील त्याच्या जन्मगावी नेण्यात आला. मंगोलियन रीवाजाप्रमाणे कोणतेही स्मारक न उभारता चंगीझचे अगदी साधेपणाने दफन करण्यात आले व इतिहासातील एका महत्त्वाच्या व्यक्ती मंगोलियाच्या विस्तिर्ण पठारावर नाहीशी झाली. चंगीझच्या दफनाबद्दल अनेक आख्यायिका आढळून आल्या तरी त्यात फार तथ्य असावे असे इतिहासकारांना वाटत नाही.


[संपादन] मृत्युपश्चात

चंगीझने उभे केलेले विस्तृत साम्राज्य त्याच्या चारही मुलांना मृत्यूपश्चात सांभाळता आले नाही. चंगीझची चारही मुले कमी अधिक प्रमाणात मदिरा व ऐशोआरामाच्या आहारी गेलेली होती. चंगीझनंतर १४ वर्षांत त्याच्या चारही मुलांचा मृत्यू ओढवला. ओगदेईच्या मृत्यूनंतर पुढील काही वर्षे राजकीय अस्थैर्याची गेली. यानंतर त्याच्या घराण्यातील काही कर्तुत्ववान स्त्रीयांनीही राजकारणाची धुरा सांभाळली. शेवटी राज्यकारभार तोलुईच्या घराण्याकडे येऊन चंगीझचे नातू हुलागू खान व कुब्लई खानाच्या राज्यग्रहणानंतर पुन्हा स्थैर्य प्रस्थापित झाले.

[संपादन] भारत आणि चंगीझ खान

भारतातील मुघल हे चंगीझ खानाचे वंशज असल्याचा दावा केला जातो. मुघल साम्राज्याचा स्थापक बाबर हा तैमूर घराण्यातील होता. १४ व्या शतकातील प्रसिद्ध सत्ताधीश तैमूर हा तुर्क-मंगोल जमातीतील एक योद्धा व सैन्याधिकारी होता. तो चंगीझ खानाच्या वंशजांपैकी एक असल्याचा कोणताही पुरावा नाही. पुढे सत्ता हाती आल्यावर त्याने चुगतईच्या वंशजांपैकी एकीशी लग्न केल्याने तो स्वत:ला 'खान घराण्याचा जावई' म्हणून संबोधित करे. चंगीझ खानाच्या घराण्याशी संबंध प्रस्थापित केल्याचा उपयोग त्याला स्वार्‍या व राज्यविस्ताराच्या दरम्यान स्वत:च्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी झाला. त्याने स्वत: 'खान' ही पदवी चालवली नाही, त्याऐवजी आपल्या नावापुढे त्याने 'आमीर' ही पदवी लावली. [ संदर्भ हवा ]

[संपादन] संदर्भ

  • गेंगीज़ खान ऍन्ड द मेकिंग ऑफ द मॉडर्न वर्ल्ड - जॅक वेदरफोर्ड
  • द मंगोल कॉन्क्वेस्ट्स - बाय द एडिटर्स ऑफ टाइम-लाइन बुक्स